शेतकऱ्यांना दिलासा:’पीएम – किसान’च्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; ​​​​​​​’ई-केवायसी’ करण्यास मुदतवाढ

44

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी. या योजनेअंतर्गतचा लाभ सहजरित्या अदा करता यावा म्हणून केंद्र शासनाने लाभार्थ्यांना त्यांची ओळख पडताळणी (ई-केवायसी) पूर्ण करण्यासाठी 31 जुलै 2022 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

बँक खात्यात होणार जमा

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबीयास पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये २ हजार रुपये प्रती हप्ता या प्रमाणे 3 हप्त्यात 6000 रुपये प्रती वर्षी लाभ त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. आज अखेर या योजनेअंतर्गत राज्यातील 1 कोटी 9 लाख 46 हजार लाभार्थ्यांना एकूण 18 हजार 151 कोटी 70 लाख रुपये लाभ अदा करण्यात आला आहे.

लिंकद्वारे होणार पडताळणी

लाभार्थ्यास स्वतः पीएम किसान पोर्टलवर https://pmkisan.gov.in/ या लिंक आधारे किंवा सामायिक सुविधा केंद्रामार्फत ई-केवायसी पडताळणी करण्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या दोन्हीपैकी स्वत:च्या सोयीनुसार एका सुविधेच्या आधारे लाभार्थ्यास त्याची ई-केवायसी पडताळणी करता येणार आहे. यापूर्वी ई-केवायसी 31 मे 2022 पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

ओटीपीच्या आधारे पडताळणी

पीएम किसान पोर्टलवरील लिंकद्वारे लाभार्थ्यास त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न केलेल्या मोबाईलवर येणाऱ्या ओटीपीच्या आधारे स्वत:ची ई – केवायसी पडताळणी करता येईल. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यासाठी सामायिक सुविधा केंद्राकडून रक्कम 15 रुपये प्रती लाभार्थी शुल्क आकारण्यात येईल.

52 लाख लाभार्थ्यांनी घेतला लाभ

राज्यात 26 मे 2022 अखेर एकूण 52 लाख 82 हजार लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरीत लाभार्थ्यांनी स्वत: अथवा सामायिक सुविधा केंद्रच्या माध्यमातून त्यांची ई-केवायसी पडताळणी केंद्र शासनाने दिलेल्या 31 जुलै 2022 च्या मुदतीपूर्वी पूर्ण करावी, असे आवाहन उपआयुक्त (कृषि गणना) पी.एम.किसान विनयकुमार आवटे यांनी केले आहे.