वन विभागात नोकरीवर नसतो तर शेती किंवा राजकारणात राहिलो असतो-राहुल कारेकर

55

प्रेस क्लब मूल वतीने घेण्यात आलेल्या मीट प्रेस या कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. स्थानिक वन विश्रामगृहात हा कार्यक्रम घेण्यात आला.
वरोरा तालुक्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या राहुल कारेकर हे सहज म्हणून वन विभागाचे भरतीसाठी अर्ज केले आणि त्यांना नियुक्ती मिळाली. सधन आणि सुखवस्तू घरात जन्म झाल्याने नोकरी करावीच अशी काही सुरुवातीपासून इच्छा नव्हती, मात्र आपण मेकॅनिकल इंजिनियर झालो पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पॉलिटेक्निक झाल्यानंतर त्यांना मेकॅनिकल ही शाखा न मिळता सिविल मिळाल्याने, त्यांनी इंजिनिअर होण्याचा विषय सोडून दिला, अशी माहिती त्यांनी एका प्रश्नाचे उत्तर दिली.
चंद्रपुरातील धुमाकूळ घालणाऱ्या एका मादी बिबट्याला शूट करण्याचे आदेश आपल्याकडे असताना आपण त्यांना बेशुद्ध केले, आणि पंधरा दिवसातच त्या बिबट्याला दोन पिले झाली, तीन जीव वाचविल्याने आपल्याला आनंद मिळाला आणि तो दिवस माझ्या वाढदिवसाचा होता हा आपल्या आयुष्यातील आनंदाचा दिवस असल्याचे त्यांनी वार्तालाप करताना सांगितले.
कर्तव्य बजावताना आपल्या कर्मचाऱ्यांना झालेली मारहाण, हा माझ्यासाठी दुःखद क्षण असल्याचेही त्यांनी एका प्रश्नाचे उत्तर सांगितले.
आपली पहिली नेमणूक गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा भागात झाली, नक्षलवाद्याचे आव्हान होते, मात्र आपल्याला वन तस्करी रोखताना कुठलाही त्रास झाला नसल्याची कबुली त्यांनी दिली.
आपण वन विभागात नोकरीवर नसतो तर शेती किंवा राजकारणात राहिलो असतो असेही त्यांनी एका प्रश्नाचे उत्तर सांगितले.मुल वनपरिक्षेत्रात वाघाची संख्या किती?
मूल बफर झोनमध्ये वनपरिक्षेत्रांतर्गत आठ वाघाचे अस्तित्व आहे त्यात चार नर वाघ आणि चार मादी वाघ. ही माहिती दिली मूल बफरचे वनपरिक्षेत्राधिकारी राहुल कारेकर यांनी.

वन्य प्राण्यांच्या वाढत्या संख्येमुळे वन्यजीव व मानव यांच्यातील संघर्ष वाढत आहे, शक्य तिथे जंगलाला कुंपण करणे हा एक चांगला उपाय असल्याचेही त्यांनी मानव वन्यजीव संघर्षावर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरात सांगितले. वन्य प्राण्यांचा शेतकऱ्यांना त्रास होतो हेही त्यांनी कबूल केले.
मीट द प्रेस ची भूमिका पत्रकार धर्मेंद्र सुत्रपवार यांनी मांडली. आभार प्रदर्शन प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष अमित राऊत यांनी केले. मीट द प्रेस ला प्रेस क्लब मूलचे सदस्य पत्रकार पदाधिकारी उपस्थित होते.