मूल च्या आठवडी बाजारात मोबाईल चोरट्यांचा धुमाकुळ

32

मूल शहरात दर बूधवारी भरणाऱ्या आठवडी बाजारावर मोबाईल चोरट्यांनी
करडी नजर ठेवल्याने नागरिकांना जवळ मोबाईल बाळगावा की नाही, असा प्रश्न पडला आहे. बुधवारी आठवडी बाजारात भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचे मोबाईल हमखास चोरी जात असल्याने बाजारात मोबाईल चोरट्यांची मोठी टोळीच कार्यरत आहे.
आठवडी बाजारात नागरिकांचे मोबाईल चोरी जातात याची कल्पना यापुर्वी घडलेल्या घटनांमुळे मूल शहरातील पोलिसांना असताना देखील त्याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने मोबाईल चोरांना मोकळे रान मिळत आहे. मूल शहरात दर बूधवारी आठवडी बाजार भरतो बाजाराचा दिवस असल्याने सकाळपासुन सांयकाळपर्यंत शहरातील नागरिक बाजारात विविध वस्तु तसेच भाजीपाला खरेदीसाठी येत असतात बाजारातील गर्दीचा फायदा घेऊन आठवडी बाजारात फिरणाऱ्या मोबाईल चोरांची येणाऱ्या नागरिकांवर करडी नजर असते. भाजीपाला खरेदीसाठी ग्राहक खाली बसल्यानंतर तसेच गर्दीत धक्का देऊन ते शर्टच्या तसेच पँटच्या खिशातील मोबाईल हातोहात लंपास करतात व पसार होतात.
मोबाईल चोरी झाल्याचे लक्षात येताच संबंधित नागरिक पोलीस ठाण्यात धाव घेतात मात्र त्यांना तेथे पोलीसांकडुन व्यवस्थित सहकार्य मिळत नसल्याने तक्रार देण्यासाठी गेलेल्या नागरिकांना गेल्या पावली माघारी फिरावे लागते वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे भाजीबाजार की मोबाईल चोरांचा बाजार असा सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे.